परळी । दिनांक १०।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सर्व अडचणींवर मात करून केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांनी मारामारी, गोंधळ करून अक्षरशः धुडगूस घातला. हा प्रकार म्हणजे चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या कामात खिळ घालण्याचा तसेच शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रकार आहे असे कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे, व्यंकटराव कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी म्हटले आहे. जो खडखडाट चालू रहावा यासाठी अनेक दिवस नियोजन लागते ते को-जन. प्रकल्प व शुगर मिल ला क्षणात दारुड्या लोकांनी बंद केले हे नुकसान आता कोणाचे ? असा सवाल ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत.
वैद्यनाथ साखर कारखाना मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कर्मचाऱ्यांच्या बंद काळातील पगारी बाबत त्यांनी केलेल्या मागणीवर विचार सुरू होता. कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी नुकत्याच परळी दौर्यात याविषयी सकारात्मक भूमिका घेतली होती. कारखान्याचे एमडी औरंगाबादला गेले हे साधून काही कर्मचाऱ्यांनी आज वजन काटा बंद केला व धुडगूस घालण्यास सुरवात केली. कामावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली तसेच दादागिरी करून एकही कर्मचारी जागेवर ठेवला नाही. अशा परिस्थितीत या परळी मध्ये चांगल्या राजकारणाला काय भविष्य राहील ? असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.
पंकजाताई मुंडे यांनी यंदा कारखाना सुरू व्हावा म्हणून अथक परिश्रम घेतले. सरकारकडून विशेष कर्ज मंजूर करून आणले. कारखाना नुकसानीत असल्यामुळेच सरकारने स्पेशल फंड मंजूर केले आणि दिव्य प्रयत्नानंतर गळीत हंगाम यशस्वरित्या सुरू झाला. त्यामुळे सर्वाना थोडी थोडी अडचण सहन करावी लागणार आहे. अशा आर्थिक संकटात सर्वांनी मिळून काम करण्याची अपेक्षा असताना दहशत माजवून चालू कामात खिळ घालण्याचा हा प्रकार आहे अशी व्यापारी व शेतकर्यांमध्ये चर्चा आहे. हा विषय सोडवण्यासाठी कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे, व्यंकटराव कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, हनुमंत नागरगोजे, माऊली साबळे, चंद्रकांत देवकते आदी प्रयत्न करत होते.
••••