गेवराई

कोरोनामुळे गेवराई आगाराला दहा कोटींचा फटका, तोट्यात धावतेय लालपरी

गेवराई - मुंबई बससेवा आजपासून सुरु



गेवराई : कोरोना महामारीमुळे गेवराई आगाराला जवळपास दहा कोटी रुपयांचा फटका बसला असून, सहा महिन्यांपासून एकाच जागेवर उभ्या असलेली लालपरी गेल्या आठवडयापासून रस्त्यावर धावू लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, बसेस सुरू झाल्या असल्यातरी कोरोना महामारीने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असल्याने, प्रवाशांचा अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे आगारातील कर्मचार्‍यांनी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले आहे.
कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस सहा महिन्यापासून एकाच जागेवर उभ्या होत्या. आगार परीसरात शुकशुकाट होता. गेवराई आगारात जवळपास सत्तर बसेस प्रवाशांना सेवा देतात. त्यासाठी, आगाराचे एकुण 230 कर्मचारी सेवेत आहेत. येथील आगाराला प्रवाशी उत्पन्नातून महिन्याला दीड ते दोन कोटी रुपये मिळतात. सहा महिने बससेवा पूर्णपणे लॉकडाऊन आहे. आगारात बस उभ्या राहिल्या होत्या. आगारात चालक आणि वाहक बसून होते. आगार परीसरात शुकशुकाट होता. ना.. प्रवाशांचा आवाज ना, चौकशी कक्षातून बस आल्याची उद्घोषणा…! सगळी कडे चिडीचूप सन्नाटा पसरलेला असायचा. विशेष म्हणजे, या आगारात 40% कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करून कुटुंबाची उपजिविका भागवितात. दोन महिन्यापासून पगार नाही. बंदच्या काळात पगारात कपात करून पेमेंट दिल्याची माहिती आहे. त्यामुळे, निव्वळ पगारावर असलेल्या कर्मचार्‍यांनी अंग मेहनत करून उदरनिर्वाह केल्याचे समजले आहे. गेल्या आठवडयात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. एका आसन व्यवस्थेवर एकच प्रवाशी बसवला जात आहे. बस निघायच्या आधी, बसला सॅनिटाईज केले जाते. प्रवाशांना मास्कचे बंधन असून, नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रवाशांचा अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारची लालपरी रस्त्यावर धावू लागल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून गेवराई आगाराच्या बसेस सुरू झाल्या आहेत. सोयीनुसार बसेस उपलब्ध करून देण्यात येत असून, गेवराई आगाराने मंगळवार दि. 1 रोजी सकाळी आठ वाजता मुंबईला जाण्यासाठी विना वातानुकूलित शयनयान व आसनी बस ची व्यवस्था केली आहे. सदरील बस शेवगाव मार्गे मुंबईला जाणार आहे. तिचे बस दुसर्‍या दिवशी पहाटे साडे पाच वाजता मुंबई येथून गेवराई येथे येणार आहे. बसायला प्रशस्त असलेल्या या बसमध्ये प्रवाशांना बसून सुरक्षित प्रवास करता येईल. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या, गेवराई आगाराने प्रवाशांच्या मागणी नुसार मध्यम व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेसची सोय करण्यात आली असल्याचे आगार व्यवस्थापक यांनी सांगितले.

लालपरी मुंबईला जाणार
गेल्या सहा महिन्यांपासून एकाच जागेवर उभी असलेली प्रवाशांची लालपरी मंगळवार ता.1 रोजी सकाळी आठ वाजता मुंबईला धावणार असून, या बसमध्ये प्रवाशांना बसून आणि झोपून प्रवास करता येणार आहे. दरम्यान, चार दिवसांपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तोट्यात धावत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांनी भिती न बाळगता स्वतःची काळजी घेऊन बसचा सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन गेवराई आगाराचे व्यवस्थापक श्रीनिवास वागदरीकर यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!