गेवराई

मराठवाड्यातील मुलींसाठी पुण्यात वस्तीगृह सुरु करणार – आ. सतीश चव्हाण,विद्यापीठाचे उपकेंद्र बीड येथे सुरु करा – अमरसिंह पंडित




गेवराई, दि. 23 (लोकाशा न्यूज) : पदविधर निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी करुन आपण मला पुन्हा तिसर्‍यांदा संधी दिली असुन माझा विजय हा तरुणांचा विजय आहे. विद्यार्थी आणि पदविधरांच्या प्रश्नांची यापुर्वी सोडवणुक केली असुन यापुढील काळातही प्रलंबित प्रश्न निश्चित सोडवले जातील. मराठवाड्यातील ग्रामीण भागाच्या मुलींसाठी पुण्यामध्ये सर्वसोईनीयुक्त वस्तीगृह सुरु करणार असल्याचे प्रतिप्रादन पदविधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आ. सतीश चव्हाण यांनी केले, तर पदविधर निवडणुकीमध्ये सतीश चव्हाण यांना गेवराई विधानसभा मतदार संघातुन सर्वाधिक मतदान झाले असुन त्यांनी गेवराई तालुक्याकडे काकणभर जास्त लक्ष द्यावे, ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार संधी द्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र बीड येथे सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केली. गेवराई येथे आयोजित केलेल्या आ. सतीश चव्हाण यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

मराठवाडा पदविधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आ. सतीश चव्हाण यांचा तिसर्‍यांदा विजय झाल्याबद्दल गेवराई येथील र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या गोदावरी सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यसपिठावर सत्कारमुर्ती आ. सतीश चव्हाण, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजीमंत्री बदामराव पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव धुमाळ, जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव जाधव, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, पाटीलबा मस्के, कुमारराव ढाकणे, अ‍ॅड. सुभाष निकम, अ‍ॅड. कमलाकर देशमुख, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, किशोर कांडेकर, युवकचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूर्हदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. रजनी शिखरे यांनी कार्यक्रम आयोजनामागची भुमिका स्पष्ट केली. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, प्रा. लक्ष्मण धुमाळ यांनी आ. सतीश चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलतांना माजी आ. अमरसिंह पंडित म्हणाले की, मराठवाडा हा गुणवत्तेची खाण आहे, शेतकरी, कष्टकर्‍यांच्या मुलां-मुलींसाठी शिक्षणामध्ये संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, विविध कपंण्यामार्फत रोजगार मेळावे आयोजित केले जातत त्यामध्ये मुलींना नौकरीही मिळते परंतू मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थींना पुण्यामध्ये राहण्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे नौकरीची संधी निघुन जात आहे त्यासाठी पुण्यामध्ये मुलींसाठी वस्तीगृह सुरु करा असेही ते म्हणाले. सत्काराला उत्तर देतांना आ. सतीश चव्हाण यांनी माजी आ. अमरसिंह पंडित यांची मागणी पुर्ण करत पुण्यामध्ये मुलींसाठी वस्तीगृह सुरु करण्याची घोषणा केली. औरंगाबाद येथील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये मराठवाड्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यापुढील काळात गेवराई येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव मार्गी लावु असेही ते म्हणाले. यावेळी माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या हस्ते आ. सतिष चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला, शिवसेनेच्या वतीने माजीमंत्री बदामरा पंडित, रोहित पंडित, इंदिरा काँग्रेसच्या वतीने प्रा. धुमाळ, श्रीनिवास बेदरे, बार असोसिएशनच्या वतीने अ‍ॅड. सुभाष निकम, कमलाकर देशमुख,स्वप्नील येवले, प्रदिप मडके यांनी सत्कार केला. या कार्यक्रमात जयभवानी विद्यालयाचा विद्याथी प्रशांत शांताराम बांगर रा. निपाणी जवळका याची महाराष्ट्राच्या टी-20 क्रिेकेट संघात निवड झाल्याबद्दल मान्यरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. संदिप बन्सोडे यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार माधव चाटे यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!