गेवराई

गेवराईत भगरीतून शंभर जणांना विषबाधा

तळणेवाडी येथील घटना ; गेवराई व बीड रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू

गेवराई, दि.11 (लोकाशा न्यूज) : गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल साठ ते सत्तर जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.संबंधितांना उलटी,मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात रेफर करण्यात आले. दरम्यान याची माहिती आरोग्य प्रशासनाला कळताच त्यांनी या रुग्णांना उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन केले. तसेच आरोग्य अधिकारी यांनी तळणेवाडी येथे धाव घेऊन ज्या कोणाला त्रास होत असेल त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहन केले असून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मंगळवारी गोकुळाष्टमी असल्याने अनेक जण उपवास धरतात. दरम्यान गेवराई तालुक्यातील धोंडराई पासून जवळच असलेल्या तळणेवाडी येथील नागरिकांनी गोकुळाष्टमी उपवासानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली होती. भगरीचा भात खाल्ल्यानंतर महिला, ग्रामस्थांना मळमळ, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला. सायंकाळी चार नंतर गावातील जवळपास शंभरहून अधिक जणांना अधिकच त्रास जाणवू लागल्याने चांगलीच धांदळ उडाली. त्रास जाणवू लागलेल्या महिला, ग्रामस्थांना वाहनाद्वारे गेवराई येथील खाजगी कुसूम हाँस्पिटल या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉ. काळे यांनी या रुग्णांवर तातडीने उपचार सुरु केले. तळणेवाडी येथील निर्मला नरवडे, सुनिता धस, सुदामती, धस, अशोक शिंदे, राधा शिंदे, उध्दव जरे, गणपती एडके, रामेश्वर धस, भाऊसाहेब खरसाडे, उषा बिल्हारे, तारामती नरवडे, सोमित्रा शिंदे, तुळसाबाई शिंदे आदी 100 हून अधिक महिला, पुरुषांना विषबाधा झाली आहे. तर या घटनेची माहिती कळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी तळणेवाडी येथे धाव घेऊन त्रास होणाऱ्या नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान या प्रकारामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून गतवर्षी अंबाजोगाई तालुक्यात देखील असाच प्रकार घडला होता.


एकाच दुकानातून भगरीची खरेदी
गेवराई तालुक्यातील तळणेवाडीत एका दुकानातून नागरिकांनी भगर खरेदी केल्याचे सांगितले जाते. या भगरीचा भात करुन खाल्यानंतर अनेकांना मळमळ, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला. यानंतर जसा जसा त्रास जाणवू लागल्याने नागरिक, महिला गेवराई येथील रुग्णालयात वाहनाद्वारे उपचारासाठी दाखल होत होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!