कडा /वार्ताहर
कोरोनाची संभाव्य लाट येण्याची असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करतानाच, कोरोना प्रतिबंधक शासन नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी केले. तर यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना अवाढव्य खर्च न करता सामाजिक उपक्रमाव्दारे विना पोलिस साजरा करावा, असे पोलिस उपाधिक्षक विजय लगारे यांनी सांगीतले. आष्टी पोलिस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत तहसिलदार राजाभाऊ कदम बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय पोलिस उपाधिक्षक विजय लगारे, नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे, पोलिस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, भाऊसाहेब गोसावी, वीज महावितरणचे अभियंता दत्ताञय दसपुते आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना तहसीलदार कदम म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करताना मुर्तीची विटंबना होणार नाही, याची गणेश मंडळांनी काळजी घ्यावी तसेच नगर पंचायतने प्रत्येक भागात रस्ता आहे का ? कुठे पाण्याचे डबके साचले का, असतील तर त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. त्यामुळे डासांची निर्मिती होणार नाही. कारण साचलेल्या डबक्यातून तयार होणा-या डासांमुळे साथीचे आजार उदभवण्याची शक्यता अधिक असते. कोरोनाचा संभाव्य धोका असल्यामुळे शासन नियमांचे पालन करुन गणेशोत्सव हा अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन कदम यांनी केले. तर उपस्थितांशी संवाद साधताना पोलिस उपाधिक्षक विजय लगारे म्हणाले की, कोरोनाच्या संभाव्य धोक्याची शक्यता असल्यामुळे शासनाने यंदाही कोरोना प्रतिबंधक नियमावली तयार केली असून त्या सर्व नियमावलीचे पालन करण्याबाबत सुचना करण्यात आल्या. यामध्ये घरगुती गणेशमुर्ती दोन फुटांपेक्षा अधिक मोठी नसावी, तर गणेश मंडाळाची मुर्ती किमान चार फुटाच्या आतच असावी. तसेच गणेश भक्तांनी अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबीर, लसीकरण, अॅटीजन चाचणी यासारखे सामाजिक कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शासानाच्या नियमांचे माहिती व आदेशाची निमावली उपस्थितींना सांगण्यात आली .या बैठकीस उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर, मनोज सुरवसे, शैलेश सहस्ञबुद्दे, पञकार सचिन रानडे, श्रीकांत भोज, महेश एकशिंगे, किशोर झरेकर, अक्षय सायकड, लेखापाल प्रकाश हरकळ व इतरांसह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
——-
डाॅल्बीवर बंदीच, नसता कारवाई
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंदा गणेश विसर्जन मिरवणूकीला शासनाची पुर्णपणे बंदी आहे. त्यामुळे नियमभंग होणार नाही, याबाबत दक्षता बाळगावी. जर एखाद्या मंडळाने जर डाॅल्बी, डि.जे. यासारखे वाद्य आणले तर त्या मंडळावर कारवाई करण्यात येईल. मात्र यावर्षीचा गणेशोत्सव हा अत्यंत साध्या पध्दतीने सामाजिक उपक्रम घेऊन विना पोलिस साजरा करावा.
- विजय लगारे
पोलिस उपाधिक्षक, आष्टी