आष्टी

वंशाच्या दिव्यासाठी सुनेला भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं, आष्टीतील घटना, महिलेच्या तक्ररारीवरून गुन्हा दाखल



बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : आपल्या कुळाचा, घराण्याचा वंश आणि वारसा हा फक्त मुलगाचं चालवू शकतो. यासाठी धांदाड विचारांनी आणि बुरसटलेल्या मानसिकतेने ग्रासलेले लोक, कधी काय करतील? याचा नेम नाही. असाच काहीसा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. पोटच्या मुलाला मुल होणार नाही हे माहिती झाल्यानंतर, वंशाला दिवा पाहिजे ही मागणी करत, चक्क सासू-सासर्‍याने सुनेला  मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. नात्याला काळिमा फासणार्‍या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
याविषयी पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे, की माझं लग्न गेल्या 15 वर्षांपूर्वी, आष्टी तालुक्यातील कडा परिसरात राहणार्‍या मोठोबा भिसे यांच्याशी झाला आहे. आम्ही नंदीबैलाच्या माध्यमातून भीक्षा मागून कुटुंबाची उपजीविका भागवतो. 2016 मध्ये माझ्या पतीसह सासू-सासर्‍यांनी, मला न सांगता अहमदनगर येथील देशपांडे हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूब बेबी करून घेतली आणि  मला मुलगी झाली. मात्र त्यानंतर 2020 मध्ये माझ्या सासूने मला सांगितले की, ’तुझा नवरा बाप होऊ शकत नाही. मला यावर विश्वास बसला नाही, त्यामुळे मी माझ्या पतीला विचारून याची शहानिशा केली आणि त्यांनी देखील मला तेच सांगितलं. त्यानंतर एक महिन्यानंतर माझे पती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन सासू म्हणाली की, तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही, त्यामुळे आपला वंश चालविण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे. म्हणून मी जे सांगते ते ऐक व तसेच कर. माझ्या भावाचा मुलगा देव यादव सोबत, तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे. त्या गोष्टीला मी नकार दिला असता माझ्या सासू-सासर्‍यांनी मला खूप मारहाण केली. त्यानंतरही मी नकार दिला मात्र सततच्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून, नाईलाजास्तव मला होकार द्यावा लागला. त्यानंतर 3 जानेवारी 2021 रोजी माझ्या सासू-सासर्‍यांनी देव यादव असणार्‍या घरामध्ये मला बळजबरीने पाठवलं आणि दाराबाहेर थांबले. त्यानंतर अनेक वेळा माझी इच्छा नसताना, माझ्या सासू-सासर्‍यांचा दबावाखाली त्याने अनेक वेळा घरी येऊन माझ्यासोबत जबरदस्ती केली. यावेळी सासू घराबाहेर थांबत असे. तर हे करण्यासाठी सासू देव यादवला खर्च-पाण्यासाठी पैसेही देत असे. त्यानंतर काही दिवसांनी मी गरोदर राहिल्याचे कळल्याने, ही गोष्ट मी माझ्या सासू सासर्‍यांसह नवर्‍याला सांगितली. हे ऐकून त्यानंतर सासू-सासर्‍यांनी मला हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन गेले आणि त्यांनी पेढे देखील वाटप केले. मात्र, यादरम्यान माझ्या नवर्‍याला हे सर्व कळलं आणि त्यांनी माझ्या भावाला बोलवून मला माहेरी पाठवलं, असं पीडितेने फिर्यादीत म्हटलंय. पीडितेचा पती तिला नांदवत नसून या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र पीडिता ही पाच महिन्यांची गरोदर आहे. त्यामुळे तिच्यासमोर जगावं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासू – सासर्‍यांनी हे कृत्य करण्यास भाग पाडलं. ती गरोदर राहिल्यावर पेढे वाटले, अनेकांना दारू पाजली. मात्र, आज पोटात असणार्‍या बाळाला, बापाचं नाव काय द्यावं, असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर आता आमच्या समाजातील लोक देखील उलटसुलट बोलत आहेत. जातीतून बाहेर काढायचं नाव घेत आहेत. त्यामुळे माझ्या माहेरी देखील मी कसा राहू, असा सवाल पीडितेने केला आहे. तर या विषयी पीडितेचा भाऊ म्हणाला की, ’2 तारखेला आम्ही तक्रार केली आहे. आज 11 तारीख उलटलीय तरी एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केला नाही. आज समाज आम्हाला नाव ठेवतोय. तिचा नवरा तिला घरात घ्यायला तयार नाही. ज्याने हे केलंय तो मुलगा देखील तिला घरात घ्यायला तयार नाही. आणि असं असताना हे मिटवण्यासाठी समाजातील लोक पैसे घ्या म्हणतात. पण पैसे घेऊन आम्ही काय करावं? आज या पाच महिन्याच्या गर्भाला नाव कुणाचा द्यावं ? त्यामुळे समाज आणि सरकारने आम्हाला न्याय द्यावा ? अशी मागणी पीडितेच्या भावाने केली आहे. तर याविषयी तपासी अधिकारी  मोबाईल पथकाच्या प्रमुख, पीएसआय राणी सानप म्हणाल्या की, ’आमचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना आम्ही अटक करू.  मात्र सध्या चुंबळी येथील मुलीच्या आत्महत्या प्रकारणात लक्ष देण्याचं वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्यामुळे थोडा वेळ लागत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!