परळी

‘वैद्यनाथ’ कारखाना बाजार पेठेचा आर्थिक कणा, तो ताठ ठेवण्यासाठी मी वचनबद्ध – पंकजाताई, पुढील हंगामात ‘वैद्यनाथ’चे विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट, अडचणींवर मात करून कारखाना सुरू केल्याबद्दल शेतकर्‍यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ताईंचे केले कौतुक !


परळी, दि. 31 (लोकाशा न्यूज) : वैद्यनाथ कारखाना हा बीड जिल्ह्याच्या बाजारपेठेचा आर्थिक कणा आहे. ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि कर्मचार्‍यांच्या हितासाठी वैयक्तिक नुकसान सहन करून कारखाना सुरू केला. माझ्या प्रयत्नाला सर्व संचालक मंडळ, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. पुढील हंगामात विक्रमी गाळप करण्याचे नियोजन असून असेच सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी कारखान्याच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले.
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने बुधवारी उत्साहात संपन्न झाली. अनेक सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कारखाना सुरू करून ऊस उत्पादकांना मोठा आधार दिल्याबद्दल शेतकर्‍यांनी कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी सभेच्या अध्यक्षांचे शब्द सुमनांनी स्वागत केले तर कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी सहभागी संचालक मंडळ, सभासदांचे शब्द सुमनानी स्वागत केले. जेष्ठ संचालक फुलचंद कराड यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कारखाना सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा दिलासा दिल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांचे ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर आणि कर्मचारी यांच्यावतीने आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मागील काही वर्षांत निसर्गाच्या अवकृपेमुळे कारखाना आर्थिक अडचणीत आला. याहीवर्षी कारखाना सुरू होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात सोडले होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा चालवत असताना शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, कर्मचार्‍यांचा विचार करून मी कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांंनी मोलाची साथ दिली. वैद्यनाथ साखर कारखाना हा बाजारपेठेचा आर्थिक कणा आहे आणि तो ताठ ठेवण्यासाठी मी वचनबद्ध आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, कारखान्याकडे उद्योग म्हणून नव्हे तर मुंडे साहेबांनी लावलेले रोपटे जोपासुन ते वाढवण्याच्या भावनेतून कारखाना चालवत आहे. साखर कारखाना चालवणे हे नगर पालिका किंवा पंचायत समिती चालण्यासारखे सोपे नाही, प्रसंगी वैयक्तिक संपत्ती गहाण ठेवून शेतकरी हित जोपासावे लागते असे सांगून त्या म्हणाल्या की, कारखाना नुकसानीत चालला तरी आर्थिक उलाढाल मोठी आहे ही संस्था सुरू राहणे शेतकरी, ऊसतोड मजूर, आणि सर्व उद्योगांच्या दृष्टीने हिताचे आहे. आगामी काळातही कारखाना पुर्ण क्षमतेने चालवण्याचे उद्दिष्टे असुन कारखान्याच्या हितासाठी सर्वांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले. सभेचे अहवाल वाचन कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी केले तर आभार प्रदर्शन जेष्ठ संचालक फुलचंदराव कराड यांनी केले. सभेचे संचलन जनसंपर्क अधिकारी ज्ञानोबा सुरवसे यांनी केले तर सभेला संचालक सर्वश्री पांडुरंगराव फड, श्रीहरी मुंडे, ज्ञानोबा मुंडे, दत्तात्रय देशमुख, केशवराव माळी, गणपतराव बनसोडे, भाऊसाहेब घोडके, व्यंकटराव कराड, जीवराज ढाकणे, सतीश मुंडे, सुरेश माने आदींची उपस्थिती होती. सर्व संचालक मंडळ आणि बहुसंख्य सभासदांनी ऑनलाईन उपस्थिती लावली.

गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर

दरम्यान गुढी पाडव्यासाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना प्रति शेअर्सला 10 किलो साखर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्रति किलो रूपये 25 भाव निश्चित करण्यात आला असल्याचे अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!