अंबाजोगाई

विलगीकरण राहण्यास सांगितलेल्या महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई तालुक्यातील घटना; कोरोनाच्या धास्तीने गळफास घेतल्याची शक्यता

अंबाजोगाई दि.(लोकाशा न्यूज): तालुक्यातील निरपणा येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.०५) उघडकीस आली आहे. या महिलेने कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुमन गणपती शिंदे (वय ४५, रा. निरपणा, ता. अंबाजोगाई) असे त्या महिलेचे नाव आहे. सुमन शिंदे यांना कोणीच नसल्याने त्या एकट्याच राहत होत्या. काही दिवसांपूर्वी त्या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी तो शेतकरी पाॅझिटीव्ह‌ असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे सुमन शिंदे यांना देखील घरी विलगीकरणात राहण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांनी राहत्या घरी ओढणीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बर्दापूर ठाण्याचे प्रभारी प्रमुख एपीआय संदीप दहिफळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण काळजी घेत पीपीई कीट घालून पंचनामा केला आणि मृतदेह स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. त्या महिलेचा मृत्यू पश्चात थ्रोट स्वॅब घेण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच अंत्यविधीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, विलगीकरणात गेल्यानंतर तणावाखाली असलेल्या या महिलेने कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!