अंबाजोगाई

लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची अपघातात जागीच ठार, अवघ्या महिनाभरात होते लग्न, अंबाजोगाई जवळ झाला अपघात


अंबाजोगाई, दि. 31 (लोकाशा न्यूज) : महिनाभरावर आलेल्या लग्नासाठी बस्ता बांधून बहिण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरूणाच्या दुचाकीला एसटीने धडक दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरूणासह त्याची बहिण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई जवळ वाघाळा पाटीजवळ रविवारी सायंकाळी सात वाजता घडला आहे.
लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा (रा. रेणापुर) येथील सेवालाल पंडित राठोड (वय 21) या तरूणाचा येत्या 28 एप्रिल रोजी विवाह होणार होता. या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल रविवारी त्याची राडी तांडा (ता.अंबाजोगाई) येथील बहीण दिपाली सुनिल जाधव (वय 20( आणि वर्षाची भाची त्रिशा यांना घेवून अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहिण आणि भाचीला घेवून सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून परत गावाकडे निघाला होता.ते वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणार्‍या लातूर-छ.संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण आपघातात बसखाली दुचाकी फरफटत जावून सेवालाल, बहिण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला. सेवालाल आणि दिपाली हे त्यांच्या मातापित्यांचे एकुलते एक अपत्य होते. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वराती रूग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांची मने हेलावली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!