मुंबई

केंद्राचा कृषी कायदा बळीराजाला आत्मनिर्भर करणारा,पंकजाताईंनी रायगड जिल्हयात साधला शेतकऱ्यांशी संवाद

अन् माझ्या डोळ्यात अश्रू तरळले ; आजच्या अनुभवावर केले ट्विट

मुंबई दि. २५ —— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय घेऊनच कृषी कायदा आणला आहे. हा कायदा बळीराजाला आत्मनिर्भर करण्याबरोबरच आत्मसन्मान मिळवून देणारा ठरेल अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी रायगड जिल्हयात शेतकऱ्यांशी आज संवाद साधला.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शहाबाज जि. रायगड येथे भाजपच्या वतीने सुशासन दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. आजच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा ७ वा हप्ता भेट देऊ केला.या अंतर्गत देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या थेट बॅक खात्यात एकूण १८ हजार कोटी रूपये जमा झाले आहेत.

संवाद साधतांना पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या की, अटलजींनी पंतप्रधान असताना सर्व सामान्य माणसाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना त्यांनीच लागू केली, जयंतीचे औचित्य साधून त्यांचेच काम मोदीजी पुढे करत आहेत. मोदींनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊनच कृषी कायदा आणला. या नव्या कायद्यामुळे कृषी क्षेत्रातील मध्यस्थांची मक्तेदारी संपुष्टात येऊन शेतकऱ्यांच्या पिळवणूकीला आळा बसेल शिवाय शेतमालाला योग्य भावही मिळेल, त्यांना त्यांच्या हक्काचे घामाचे दाम मिळावेत यासाठी आणलेला हा कायदा शेतकऱ्यांचे कल्याण करणारा आहे, विरोधक मात्र यात राजकारण करू पाहत आहेत असे त्या म्हणाल्या. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ऊस उत्पादकासाठी झोनबंदी उठवणारा कायदा केला होता याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

कार्यक्रमास आ. रविसेठ पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, मिलिंद पाटील, हेमा मानकर यांसह भाजपचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन् पंकजाताईंनी शेतकऱ्यांसह ऐकले भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ
काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा स्क्रिन लाऊन करण्यात आले. पंकजाताई मुंडे यांनी प्रेक्षकात शेतकऱ्यां समवेत बसून मोदीजींचे भाषण ऐकले. या कार्यक्रमा संदर्भात ट्विट करून त्यांनी आपला अनुभव शेअर केला. ‘ माझ्या देशातील शेतकरी विकसित होत आहे.आज देशातील ९ हजार कोटी शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात एका क्षणात १८ हजार कोटी रूपये जमा करण्यात आले. ज्यावेळी स्क्रिनवर आकडे स्क्रोल होत होते,त्यावेळी मला अभिमान वाटत होता, त्याक्षणी माझ्या डोळ्यात अश्रू तरळले होते असे त्यांनी म्हटले.’

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!