मुंबई

अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी; राज्य शासनाचा मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने  गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.कोरोना काळात अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले. अधिकारी संघटनांनी देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल देत कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास  गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे.  याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून  महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021  तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!