मुंबई

पोलीस भरतीत मराठा समाजाला राज्य सरकार न्याय देणार : गृहमंत्री अनिल देशमुख


मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान राज्यात पोलीस विभागातील 12 हजार 528 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पण, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार विनायक मेटे यांनी पोलीस मेगा भरतीत मराठा समाजाच्या 13% जागा रिक्त ठेवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी रिक्त ठेवा आणि मग भरती करावी, या मागणीसाठी आमदार विनायक मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज भेट घेतली. याबाबत गृहमंत्री देशमुख सकारात्मक आहेत, असं मेटे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय राज्य सरकार देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर दिली आहे. पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला आदेश दिले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!