मुंबई / नाशिक : केंद्र सरकारने निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई पोर्ट आणि बांग्लादेश बॉर्डरवर रोखून धरल्याने कांदा कोंडी निर्माण झाली आहे. कांद्याचे भाव 2600 ते 2700 रुपयांपर्यंत खाली कोसळलेत. तर मुंबई बंदरातून निर्यातीसाठी निघालेला 400 कंटेनर कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशकात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्याबंदी लागू केली आहे. कांद्याचे दर वाढत आहेत. कांदा पुन्हा रडवणार अशी स्थिती दिसून येत आहे. देशभरात आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात दररोज वाढ होत आहे. गेल्या एका आठवड्यात कांद्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. नाशिकमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचा दर वाढलेला दिसून येत आहे. वाढते दर रोखण्यासाठी केंद्रसरकारकडून ही निर्यात बंदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्रानं निर्यातबंदी उठवल्यानंतर कांदा उत्पादक शेतकर्यांना दोन पैसे मिळू लागले होते. मात्र केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकर्यांना कांदा पुन्हा रडवण्याची शक्यता आहे.















