देश विदेश

कोरोना लशीच्या वितरणाविषयी काम सुरू; आरोग्यमंत्र्यांनी लशीबद्दल दिली महत्त्वाची माहिती

दिल्ली, दि. १३ (लोकाशा न्यूज) : देशातील कोरोनाचा प्रसार अद्यापही कमी झालेला नाही. दररोज हजारो रुग्ण देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आढळून येत असून, करोनावरील लस कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी मंत्रिगटाच्या बैठकीत करोना लस व त्याच्या वितरणाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. २०२१ च्या सुरूवातीच्या काळात लस येण्याची आशा असून, अनेकांकडून लस पुरवली जाणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्रिगटाची मंगळवारी बैठक झाली. यावेळी बोलताना हर्ष वर्धन म्हणाले, “पुढील वर्षाच्या सुरूवातीलाच आपल्याकडे एकापेक्षा जास्त कंपन्याकडून लस घेण्याची आम्हाला अपेक्षा आहे. तज्ज्ञांचा गट देशात लशीचं वितरण कसं करावं, याविषयी योजना तयार करण्यासाठी धोरण ठरवत आहेत,” असं आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीही माध्यमांशी बोलताना लस येण्याबद्दल माहिती दिली होती. मंत्रिगटाच्या बैठकीत त्यांनी सरकारकडून लस वितरणाबाबत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौमय्या स्वामीनाथन यांनीही करोना लस २०२० च्या अखेरीपर्यंत नोंदणीसाठी तयार होणार असल्याचं सांगितलं. स्वामीनाथन म्हणाल्या,”तुम्हाला माहिती आहे की, आमच्याकडे सध्या ४० लस आता क्लिनिकल ट्रायल्सच्या टप्प्यात आहे. यापैकी १० लशी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. जे शेवटच्या चाचण्याच्या टप्प्यात आहे. जे आपल्याला त्याची कार्यक्षमता व सुरक्षितता याविषयी सांगतील,” असं त्या म्हणाल्या. कोरोना लशीच्या वितरणाबद्दल काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली होती. केंद्र सरकार सर्वांना व समान लशीच्या वितरणासाठी राज्याकडून माहिती घेत असल्याचं सांगितलं होतं. देशातील प्रत्येकापर्यंत लस पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आणि प्राथमिकता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!