देश विदेश

नोव्हेंबर भाजपासाठी ऐतिहासिक ठरणार; राज्यसभेत मोदी सरकारची ताकद वाढणार


दिल्ली, दि. 9 : राजकारणात नंबर गेम कायम महत्त्वाचा असतो. त्यामुळेच राजकारणाला आकड्यांचा खेळ म्हटलं जातं. हाच आकड्यांचा खेळ पुढील दोन महिन्यांत भाजपाची ताकद वाढवणार आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या सामर्थ्यात भर पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपानं स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपानं बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकल्या. मात्र राज्यसभेत पक्षाला बहुमत गाठता आलेलं नाही. पुढील दोन महिन्यांमध्ये घडणार्‍या घडामोडींमुळे भाजपाची संसदेच्या वरिष्ठ सदनातील ताकद वाढणार आहे. राज्यसभेतील पक्षीय संख्याबळ पुढील दोन महिन्यांत बदलणार आहे. त्यामुळे आता भाजपाला महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यासाठी दुसर्‍या पक्षांवर अवलंबून राहावं लागणार नाही. इतिहासात पहिल्यांदाच एनडीएला राज्यसभेत बहुमत मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी, तर नोव्हेंबरमध्ये 10 जागांसाठी निवडणूक होतेय. विशेष म्हणजे या 11 जागा उत्तर प्रदेशातल्या आहेत. उत्तर प्रदेशात 11 सप्टेंबरला राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होतेय. अमर सिंह यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपानं राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर प्रदेशातलं भाजपाचं संख्याबळ पाहता पेशानं बँकर असलेल्या सय्यद जफर इस्लाम यांचा विजय पक्का आहे. नोव्हेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकीमुळे राज्यसभेतलं संख्याबळ पूर्णपणे बदलेल. नोव्हेंबरमध्ये राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत असून भाजपाचं उत्तर प्रदेश विधानसभातलं संख्याबळ लक्षात घेता त्यांचे 8 उमेदवार अगदी सहज जिंकू शकतील. सध्याच्या घडीला उत्तर प्रदेश विधानसभेत 395 आमदार आहेत. तर 8 जागा रिक्त आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेतील आमदारांची संख्या पाहता प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 37 मतं आवश्यक आहेत. विधानसभेत भाजपाचे 305 आमदार असल्यानं त्यांचे 8 उमेदवार सहज निवडून येतील. त्यानंतरही त्यांच्याकडे काही मतं शिल्लक राहतील. त्यामुळे भाजपा नववा उमेदवार देऊ शकेल. 8 उमेदवार जिंकून शिल्लक राहिलेली मतं, याशिवाय मित्रपक्ष असलेल्या अपना दलची 9 मतं यांचा विचार केल्यास 22 मतं होतात. यासोबतच भाजपाला काँग्रेसच्या काही नाराज आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो. रायबरेलीतल्या हरचंदपूरचे आमदार राकेश सिंह आणि सदरच्या आमदार अदिती सिंह भाजपाला मतदान करू शकतात. माजी राज्यसभा खासदार नरेश अग्रवाल यांचे पुत्र नितीन अग्रवाल समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले असले, तरी तेदेखील भाजपाला मतदान करू शकतात. अशाच काही आमदारांवर भाजपाचं लक्ष आहे. सप्टेंबरमध्ये 1 आणि नोव्हेंबरमध्ये 9 जागा जिंकल्यास राज्यसभेत एनडीए बहुमताचा आकडा गाठेल. एकूण 245 सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेत सध्या भाजपाचे 86 खासदार आहेत. तर एनडीएचं एकूण संख्याबळ 113 इतकं आहे. सप्टेंबरमध्ये 1 आणि नोव्हेंबरमध्ये 9 अशा एकूण 10 जागा भाजपानं जिंकल्यास भाजपाचं संख्याबळ 96 वर जाईल. तर एनडीएचा आकडा 123 वर पोहोचेल. त्यामुळे पहिल्यांदा एनडीए राज्यसभेत बहुमतात येईल.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!