बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्ताने 1367 गावांमध्ये जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी उपलब्ध करून देणे, मंजूर झालेल्या योजनांची आराखड्याप्रमाणे लोकवर्गणी जमा करणे यांच्यासह नऊ संकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष ग्रामसभा व बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिली आहे. दि. 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे गावातील सामान्य ग्रामस्थांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती देऊन त्यांचे पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण व जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून प्रामुख्याने त्यात नऊ संकल्प घेण्यासाठी ग्रामसभेत चर्चा मंजुरी आवश्यक आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.
23 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमधून विशेष बाल सभा घेण्यात येणार आहेत. शिक्षण विभागामार्फत या बाल सभांमधून त्यांना हव्या असलेल्या विविध उपक्रमांची माहिती संकल्प भविष्यातील हेच ग्रामस्थ ठरवणार आहेत. राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्ताने केंद्र व राज्य शासनाने विविध उपक्रम व आराखड्यातून करावयाच्या विविध कामाचा तरतुदीमध्ये नव्याने सुधारणा केल्या आहेत, त्यानुसार या आर्थिक वर्षापासून शाश्वत विकासाच्या ध्येयाची पंचायतराज यंत्रणे मार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. व ग्रामसभामध्ये ग्रामपंचायत स्थापनेचा दिवस निश्चित केला जाणार आहे. दि.24 एप्रिल हा दिवस देशपातळीवर पंचायतराज दिवस म्हणून साजरा केला जातो, या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करून गावाच्या विकासासाठी ग्रामसभेत विविध 9 संकल्पांची निवड करण्यात येणार आहे. यावर्षी ग्रामसभेमध्ये नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या संकल्पनावर चर्चा करून आराखड्यात तरतूद केली जाणार आहे. नऊ संकल्पामध्ये सर्वांसाठी विकास, समृद्ध शेती व शाश्वत उपजीविका व आर्थिक स्तर उंचावणारे उपक्रम उपलब्ध असतील असे गाव निर्माण करणे, सर्व लहान बालके, तरुण, प्रौढ ते अबालवृद्धांना निरामय जीवन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील बालक व किशोर अवस्थेतील मुले भविष्यातील ग्रामस्थ आहेत या सर्वांना उच्च दर्जाचे जीवनमान, विकासाचा आणि संरक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणे, गावातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणी शाश्वत व शुद्ध दरडोई 55 लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे,पाऊस पाणी संकलन तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता, पर्यावरण पूरक गावाची निर्मिती करणे, भविष्यातील देखभाल दुरुस्ती होईल तसेच सर्वांना परवडतील अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना निवड करून विविध योजनेत सामावून घेणे, केंद्र व राज्य शासनाच्या मंजूर असलेल्या सर्व विकासाच्या योजनांचा लाभ देणे, गावात लहान मुलीं ,महिला व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व भावनिक दृष्ट्या सुरक्षित वातावरण निर्माण करणे तसेच सक्षमीकरणाचे विविध उपक्रम घेणे जिल्ह्यात या विशेष ग्रामसभांच्या परिणामकारक संचलनासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभेतील उपक्रमांची माहिती व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टलच्या डॅशबोर्डवर अद्यावत करण्याचे अवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार यांनी केले आहे.















