धारूर, दि. 24 (लोकाशा न्यूज) : एक एक चांगला निर्णय नेहमीच गावकर्यांचे भल्ले करून जातो, विशेष म्हणजे त्या गावाची ओळखही सर्वत्र होते, अशा वेगवेगळ्या कल्याणकारी निर्णयामुळेच आज आवरगावने (ता. धारूर) संपूर्ण जिल्ह्यात आदर्श अशी ओळख निर्माण केली आहे. यामुळेच स्मार्ट ग्राम म्हणून आवरगावची नोंद झालेली आहे. कोरोना रोखण्यातही आवरगावकर थोडेही मागे हाटलेले नाहीत, सरपंच, ग्रामसेवक, आशाताई, आंगणवाडीताई, सीएओ, सिस्टर अन् ग्रामस्थांच्या मेहनतीमुळे आज आवरगाव कोळपिंपरी उपकेंद्रात सरस ठरले आहे. कारण या गावामध्ये शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाले आहे.
जिल्ह्याचे माजी खा. रामरावजी आवरगावकर यांच्यामुळे आवरगावची संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. त्यांच्यानंतर आता अमोल जगताप यांच्या माध्यमातून आवरगावकरांना एक चांगले नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळेच विकासात आवरगावकर एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. जगताप यांनी ग्रामस्थांना आपल्या सोबत घेवून या गावात केलेल्या कल्याणकारी कामांमुळेच तालुक्याबरोबरच जिल्ह्यात स्मार्ट ग्राम म्हणून आवरगावची नोंद झाली आहे. या गावाला स्वत: सीईओ अजित पवार, तत्कालिन सीईओ अजित कुंभार, तात्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी स्वत: भेट दिलेली आहे. सरपंच पद्मीनीबाई जगताप, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे, आशाताई अंजली नखाते, आंगणवाडीताई निता नखाते यांचे काम अत्यंत प्रभावी आणि ग्रामस्थांना दिशा देणारे, त्यांना प्रभळ बनविणारे आहे. कारण शासनाची प्रत्येक योजना गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवून त्याचा त्यांना लाभ मिळवून देण्याचे काम आज खर्या अर्थाने सरपंच, ग्रामसेवक, आशाताई आणि आंगणवाडीताईंच्या माध्यमातून होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाला रोखण्यातही या सर्वांचे योगदान खरोखरच मोठे आहे. आता विशेष म्हणजे लसीकरणातही या सर्वांची कामगिरी उल्लेखनीय राहीली आहे. कारण त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीमुळेच आज कोळपिंपरी उपकेंद्रात आवरगावमध्ये शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाले आहे. या गावात 18 वर्षांवरील अपेक्षीत लाभार्थी 470 व पहिला डोस पुर्ण झालेले 470 दुसरा डोस पुर्ण झालेले 380 आहेत. दरम्यान शंभर टक्के लसीकरण पुर्ण केल्याबद्दल 22 ऑक्टोबर रोजी स्वत: तालुका आरोग्य अधिकारी श्री. लोमटे यांनी आवरगावला भेट दिली, यावेळी त्यांनी सरपंच पद्मीनीबाई जगताप, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे, आशाताई अंजली नखाते, आंगणवाडी ताई निता नखाते, सीएचओ गुनाल मॅडम, सिस्टर जे.पी. दिक्षीत अन् ग्रामस्थांचे आभारही मानले.















