देश विदेश

शेतकरी संसदेला घेरण्याच्या तयारीत

दिल्ली, दि.5 (लोकाशा न्यूज) : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृषी विधेयके संसदेत मंजुर झाल्यानंतर राज्याराज्यात आंदोलन करणारे शेतकरी कायदा अस्तित्वात आल्यानंतर दिल्लीत येऊन धडकले आहेत. मागील आठवडाभरापासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मुक्काम ठोकला असून, सरकारसोबत चर्चाही सुरू आहे. आतापर्यंत चार फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, चारही वेळा चर्चा फिस्कटली. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे.
कृषी क्षेत्र अधिक खुले करण्याचा दावा करत मोदी सरकारनं तीन कृषी कायदे केले. या कायद्यांना शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होताना दिसत आहे. आधी राज्याराज्यात शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केली. मात्र, सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीत आंदोलनासाठी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!