Uncategorized

जिल्ह्यातील आणखी 507 शेतकर्‍यांचे कर्ज माफ, मयत शेतकर्‍यांच्या वारसांना मिळाला मोठा दिलासा, कर्जमाफीसाठी आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे कलेक्टरांचे आवाहन


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : डिसेंबर 2019 अन्वये राज्यतील शेतकर्‍यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी अजूनही चालू आहे.
विशेष म्हणजे कर्ज घेणारे शेतकरी मयत झाल्यामुळे त्यांचे कर्ज माफ झाले नव्हते, याची माहिती जिल्ह्यातील बँकांनी सरकारला पाठविली होती, त्यानुसार मयत असणार्‍या जिल्ह्यातील 507 शेतकर्‍यांचे कर्ज सरकारने माफ केले आहे. याचा लाभ आता या शेतकर्‍यांच्या वारसांना होणार आहे. या योजनेतर्गंत दि. 9 मे 2023 रोजी जिल्ह्यातील लाभार्थ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी आधार प्रमाणीकरणसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सदर शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी केले आहे.

507 शेतकर्‍यांची विशिष्ट क्रमांकासह यादी संबधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सूचना फलक, जिल्हा उपनिबंधक, कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात प्रसिध्द करण्यात येणार आहेत. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यातील शेतकर्‍यांनी संबंधित बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची लाभाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणिकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम अमान्य असेल, तर त्याबाबत शेतक-याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे. अशा प्राप्त होणार्‍या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतक-यंनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तती योजना 2019 अंतर्गत कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सामुदायिक सेवा केंद्रावर अथवा संबधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!