Uncategorized

शिक्षणाने व्यक्ती तर संस्काराने समाज घडतो – पंकजाताई,खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे थाटात उदघाटन ; शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचेही केले वाटप

अंबाजोगाई । दिनांक ०१ ।
शिक्षणाने व्यक्ती घडतो तर संस्काराने समाज घडतो.मानवी जीवनात शिक्षणाबरोबरच संस्कार देखील तितकेच महत्वाचे आहेत,शिक्षण कितीही घेतले तरी संस्कार नसतील तर त्या शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२१-२२ चे उदघाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठया थाटात झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुरेंद्र आलुरकर तर प्रमुख पाहूणे म्हणून रा.स्व.संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख उपेंद्र कुलकर्णी, आ.नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, नांदेडच्या स्वा. रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन,संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, डाॅ. कल्पना चौसाळकर, चंद्रकांत मुळ्ये, आप्पाराव यादव आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा या संस्थेशी ऋणानुबंध होता.तोच स्नेह आणि कौटुंबिक नाते भविष्यातही राहणार आहे.एका विचाराने आपण जोडले गेले आहोत.आजच्या पिढीला संस्कार देण्याचे मोलाचे कार्य या संस्थेतून होत आहे.महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपालांना आमंत्रित करणार असल्याचे देखील याप्रसंगी पंकजाताई म्हणाल्या.तत्पूर्वी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचे वाटप करण्यात आले.खोलेश्वर महाविद्यालयाच्या सोलार प्रोजेक्टसाठी आ. नमिता मुंदडा यांच्या वतीने त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कुलकर्णी यांनी केले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!