बीड गेवराई

पंचवीस वर्षीय विवाहितेला विषारी औषध पाजून खून केल्याचा आरोप; गेवराई पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा रात्री उशिरापर्यंत ठिय्या

गेवराई : – एका विवाहीत महिलेला नवरा, सासू, सासरा, दिरानी मिळून शारिरीक व मानसिक छळ करून तिला बळजबरीने विष पाजून खून केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला असून दरम्यान, सासरच्या लोकांविरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी करून महिलेच्या नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाण्यासमोर मुलीचा मृतदेह ठेवून ठिय्या दिला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष बाब म्हणजे, महिलेचा मृत्यू होताच नवरा व अन्य लोकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
कांचन (कविता) विशाल राठोड, ( वय, 26 ) रा. सिद्धीविनायक नगर मध्ये तिच्या सासरी राहत होती. कोणत्या तरी कारणावरून सासरचे लोक तिचा मानसिक, शारीरिक त्रास देऊन छळ करीत होते. 10 जून रोजी तिला बळजबरीने नवरा, सासू, सासरे आणि दिराने मिळून तिला विष पाजले असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.अत्यवस्थ अवस्थेत तिला गेवराई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू , प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू होताच, तिचा नवरा, सासू, सासरे व दिराने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, शुक्रवार दि. 25 रोजी महिलेच्या नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाण्यात मृतदेह आणून ठिय्या दिला. जोपर्यंत खूनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी कठोर भूमिका घेतल्याने, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी शांततेची भूमिका घेऊन प्रकरण हाताळले. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!