बीड

भरून पावले..तुमच्या समर्थनाने ! पण मला हा निधी नकोय मला फक्त तुमचे आशिर्वाद द्या, वैद्यनाथ कारखान्यासाठी मदतीची महाचळवळ उभी करणार्‍या राज्यातील समर्थकांना पंकजाताईंनी केले आवाहन


बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर षडयंत्र रचून केलेल्या कारवाईनंतर राज्यभरातून मुंडे समर्थकांनी मदतीचे मोठे अभियान सुरु केले आहे. आतापर्यंत सात कोटींपेक्षा अधिकची रक्कम गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने तयार झाली आहे. मात्र पंकजाताई मुंडे यांनी आता हा निधी नकोय अशी भूमिका घेतली आहे. मला केवळ तुमचे आशीर्वाद द्या, असे भावनिक आवाहन पंकजाताईंनी केले आहे. कितीही वाईट वेळ आली तरी आई आपल्या लेकराच्या ताटातलं घेत नाही. कोणी कितीही टिका केली तरी मी तूमच्या आईच्या भूमिकेत आहे. तूम्ही 20 कोटीच काय 40 कोटी सुध्दा जमवाल, पण तुमच्या संसारातलं, तुमच्या लेकरांच्या लग्नासाठी ठेवलेलं असं मला नको… फक्त साथ, प्रेम आणि आशीर्वाद द्या’ असेही ताईंनी म्हटले आहे.

पंकजाताईं मुंडे यांनी एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये शेअर केला आहे. त्यात त्यांनी ‘माझ्या अडचणीत आपण सर्व उभे राहिलात, यामुळे गहिवरून आले आहे. आधी शिव शक्ती परिक्रमेत तुम्ही सर्व माझ्यासोबत ताकतीने उभे राहिलात, सध्या प्रचंड संघर्षातून जावे लागत आहे, या संघर्षात आपल्या एकमेकांचा जीव घट्ट होत आहे. कारखान्याच्या जीएसटीसाठी आपण ज्या पध्दतीने मदत देत आहात, ते खरच आपलं मोठेपण आहे. आपल्या घरातलं किडूक मिडूक विकून आपण जे मदत निधीवर शून्यावर शुन्य लावत आहात ते डोळे दिपवणारं आहे. पण आता तसं करु नका. यातून काय मार्ग काढायचा यासाठी मी वकीलांचे, सीएंचे सल्ले घेत आहे, त्यातून मी योग्य मार्ग काढेल. त्यामुळे तुम्ही मला पैसे देऊ नका, फक्त आशीर्वाद द्या… गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्यात स्वाभिमान पेरला आहे. आपण त्याच स्वाभिमानाने या प्रसंगातून जाऊ. पण मी देणारी आहे. कितीही वाईट वेळ आली तरी आई आपल्या लेकराच्या ताटातलं घेत नाही. कोणी कितीही टिका केली तरी मी तूमच्या आईच्या भूमिकेत आहे. तूम्ही 20 कोटीच काय 40 कोटी सुध्दा जमवाल, पण तुमच्या संसारातलं, तुमच्या लेकरांच्या लग्नासाठी ठेवलेलं असं मला नको… फक्त साथ, प्रेम आणि आशीर्वाद द्या’ , तुमच्याकडून अशी रक्कम घेणं हे मला परवानगी देत नाही, स्वाभिमानी राहूनच आपण या संघर्षाला समोर जावून त्यातून मार्ग काढू, असेही पंकजाताईंनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या या अहवानानंतर आता मदतीचा यज्ञ थांबणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!