महाराष्ट्र

पंकजाताई मुंडे यांचे ऑनलाईन बदल्यांचे धोरण योग्यच ; यापुढेही तेच धोरण राहणार,शिक्षक संघटनांच्या दबावापुढे महाविकास आघाडी सरकार अखेर झुकले !

मुंबई। दिनांक ०४ ।
ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता हे अखेर सिध्द झाले आहे. हा निर्णय रद्द करून ऑफलाईन बदल्या करण्याची महा विकास आघाडी सरकारची घोषणा हवेत विरली आहे. राज्यातील शिक्षकांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारला माघार घ्यावी लागली असून यापुढे बदल्या हया ऑनलाईनच होणार आहेत, तसा आदेशच सरकारने काढला आहे.

शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अतिशय किचकट झाली होती शिवाय यात घोडेबाजारही होत होता, हा सर्व प्रकार थांबवून बदली प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना आग्रही भूमिका घेऊन ऑनलाईन बदली धोरण अवलंबिले होते. या धोरणाचे राज्यातील सर्व शिक्षकांनी स्वागत केले होते तथापि, राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन धोरण रद्द करून ऑफलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षकांना आली पंकजाताईंची आठवण !

राज्य सरकारच्या निर्णयामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या, त्यांनी ऑफलाईनला कडाडून विरोध दर्शविला. अखेर या आक्रमकतेपुढे सरकार झुकले आणि पंकजाताई मुंडे यांनी घेतलेला ऑनलाईन बदल्यांचा निर्णय कायम ठेवला. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या शिक्षक संघटनांच्या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे आदेश काढले. देशाची भावी पिढी घडविणा-या शिक्षकांना बदल्यांसाठी त्रास होऊ नये, वारंवार खेटे मारावे लागू नये यासाठी बदली प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करणा-या पंकजाताई मुंडे यांची आठवण शिक्षकांना सातत्याने येत होती. बदली धोरण पुन्हा ऑनलाईन झाल्याबद्दल त्यांनी पंकजाताई मुंडे यांचे मनापासून आभार मानले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!