बीड

ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाने बीड शहर दणाणले!

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे - माजी आ. पंकज भुजबळ



बीड / प्रतिनिधी
आठरा पगड जाती- धर्मातील ओबीसींना घटनेने दिलेले आरक्षण धोक्यात आले असून ते टीकवण्यासाठी सर्व ओबीसी समाज एकीची वज्रमुठ बांधून आरपारची लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरला असून आज बीड येथे सिद्धिविनायक कॉमप्लेक्स,महात्मा फुले पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चाने बीड शहर दणाणून गेले होते. यावेळी मार्गदर्शन करताना
माजी आ. पंकज भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा तथा बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचा विराट मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता. या मोर्चामध्ये माजी आ. पंकजभाऊ भुजबळ, महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, दिलीप अण्णा खैरे, बाळासाहेब कर्डक, भीमराव आबा दळे, डॉ. नागेश गवळी, गणेश होके, प्रसाद सोनवणे, गणेश जगताप, अर्जुन दळे, अॅड. संदीप बेदरे,प्रकाशदादा कानगावकर, संजय गुरव, रफिक बागवान, गणेश पुजारी, बापूसाहेब भालेकर, अमर ढोणे, इंजि. विष्णूदादा देवकते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पंकजभाऊ भुजबळ म्हणाले की, छोट्या- छोट्या जातींमध्ये विभागलेला आणि पारंपरिक व्यवसाय करून उपजिविका भागवणारा ओबीसी समाज आजही शैक्षणिक, सामाजिक, अर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे. एकीकडे ओबीसींचे मागासलेपण दुर करण्यासाठी कसलेही प्रयत्न होत नसताना दुसरीकडे घटनेने दिलेले आरक्षण हीरावून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ओबीसी समाजासह व्हिजेएनटी, एसबीसी जाती- जमातींचे आरक्षण बंद करण्याची मागणी करणारी याचीका न्या. गायकवाड आयोगाच्या सर्व्हेक्षणाचे कंत्राट मिळवणार्‍या बाळासाहेब सराटे यांनी मंबुई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सदरील याचिका न्यायालयाने स्विकारली असून लवकरच यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत ओबीसींचे आरक्षण हीरावून घेण्याची बाजू मांडण्यात सराटे यशस्वी झाले तर ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. आरक्षण धोक्यात आल्याने ओबीसींचे अस्तीत्वच संपणार आहे. आरक्षण हिसकावून घेण्याचे डावपेच उधळून लावण्यासाठी ओबीसींना संघटीत होऊन एकीची वज्रमूठ बांधावी लागणार आहे. ओबीसींना ‘ओबीसी नाहीत’ म्हणण्याचे धाडस करणारांना अस्तीत्व दाखवून देण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्व ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरून आरपारची लढाई लढावी लागणार आहे.
तर बापूसाहेब भुजबळ म्हणाले की, 52 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना अवघ्या 17 टक्के जागा दिल्या आहेत. यातील 12 टक्केच जागा भरल्या जातात. या परिस्थितीत प्रबळ, सत्ताधारी आणि राज्यकर्ते असलेल्या मराठा समाजाचा समावेश ओबीसीत केला तर मराठा समाजाचे आणि ओबीसींचेही नुकसान होणार आहे. यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आणि स्वतंत्र आरक्षण द्यावे, मंडळ आयोगाची 100 टक्के अंमलबजावणी करावी, राज्यातील शासन, प्रशासन सेवा आणि शैक्षणिक संस्थांमधील ओबीसींच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात. विद्यार्थ्यांची बंद पडलेली शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करावी, ओबीसींच्या महाज्योती संस्थेस 1 हजार कोटींचा निधी मंजूर करावा, ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळी मोर्चाचे प्रस्ताविक अॅड. सुभाष राऊत यांनी केले. मोर्चा प्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चाने अख्खे बीड शहर दणाणून गेले होते.

ओबीसींचे पारंपरिक व्यवसाय ठरले मोर्चाचे आकर्षण
आज निघालेल्या ओबीसी समाजाच्या या मोर्चामध्ये ओबीसींच्या पारंपरिक व्यवसायांचे साक्षात प्रदर्शन ट्रॅक्टरवर करण्यात आले होते. कुंभार,नाभिक, परीट, सोनार, माळी, आत्तार, तांबोळी, शिंपी यांच्यासह ओबीसी समाजातील विविध बांधवांनी आपल्या व्यवसायाचे प्रदर्शन केले होते. याबरोबरच संबळ वादक, पोतराज, वासुदेव, वाघ्या-मुरळी आदींनी या मोर्चात सहभाग घेतल्याने हे सर्वच ओबीसी बचाव मोर्चाचे आरक्षण ठरले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!