माजलगाव । दि. ०८ ।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर बीड जिल्ह्यातील जनतेने प्रचंड प्रेम केल, त्यांच्या पश्चात हे प्रेम आमच्या वाट्याला आलं आहे. या प्रेमात तसुभर ही कमतरता जाणवली नाही. याउलट दिवसेंदिवस या प्रेम आणि आशीर्वादामध्ये वाढ होते आहे. जनतेच्या या प्रेमातून उतराई होण शक्य नाही, परंतु विकास कामांच्या माध्यमातून आणि तुमच्या सेवेतून या प्रेमाचा सन्मान करत राहू ‘ अशी ग्वाही खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी इथे बोलताना दिली.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत माजलगाव तालुक्याच्या गोविंदवाडी इथे मंजूर झालेल्या तीन कोटी सत्तेचाळीस लक्ष रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंचावर डॉ. प्रकाश आनंदगावकर , भाजप नेते रमेश आडसकर, मोहनराव जगताप, बबन बाप्पा सोळंके, बाबरी मुंडे, रमेश कराड, प्रदीप जाधवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे आम्हाला तुमची पाण्याची अडचण सोडवण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या योजनेमुळे ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचणार आहे. जिल्ह्याची खासदार म्हणून या योजनेचे पहिले भूमिपूजन गोविंदवाडीत करताना मनस्वी आनंद होतो आहे, मुंडे साहेबांच्या प्रवासातील तुम्ही सोबती आहात. तुमच्या गावचा पाण्याचा प्रश्न मला सोडविता आला हे मी माझे भाग्य समजते असे त्या म्हणाल्या.
स्वागत,सत्कार आणि शुभारंभ ; जनतेच्या निस्सीम प्रेमाची प्रचिती
गोविंदवाडी इथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यासाठी जाताना खा.प्रितमताई मुंडे यांचे गावोगावी जल्लोषात स्वागत झाले. यावेळी महिला भगिनींकडून औक्षण आणि आबालवृद्धांकडून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली गेली. गोविंदवाडी इथे तर घरोघरी महिला भगिनी औक्षण करत होत्या, ढोलताशांच्या गजरात जेसीबीतून पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी खा.प्रितमताईंच उत्स्फूर्त स्वागत करत भव्य सत्कार केला.ग्रामस्थांच्या या स्वागत, सत्कार आणि प्रेमाने मी भारावून गेले आहे. राजकारणातून जनतेची कामे करत असताना या प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे, हे प्रेम आणि आशीर्वाद अबाधित राहू द्या अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
••••















