Uncategorized

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन


पुणे, दि. 14 (लोकाशा न्यूज) : आपल्या रसाळ, लालित्यपूर्ण शैलीने शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणार्‍या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे काम करणार्‍या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले.
प्रचंड व्यासंग, उत्साहाचा धबधबा असल्याने भव्यदिव्य अन् हिमालयाहून अधिक उंचीचे एकाहून एक सरस असे उपक्रम अखेरच्या महिन्यापर्यंत करणारी प्रेरणाज्योत विझल्याने सह्यगिरीतील गडेकोट अन दर्‍याखोर्‍या मुक्या झाल्या. अखेरपर्यंत म्हणजे कोरोनाची महासाथ सुरू होईपर्यंत व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने त्यांच्या झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी उत्साहाने दीड-दीड तास आपले मनोगत व्यक्त केले होते. तसेच दसर्‍याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमासही ते प्रमुख पाहुणे होते. मात्र 26 ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रविवारी त्यांचे निधन झाले. पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. त्यांच्या सर्वच परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक कमावला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!