महाराष्ट्र

राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

​राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांसोबतच कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने थैमना घातले आहे. दरम्यान कोकणातील अनेक भागांमध्ये दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. आता मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!