बीड

कामात थोडीही बोगसगिरी खपवून घेणार नाही, ग्रामीण भागात सुरू असलेल्या कामांना अचानक भेटी देवून सीईओंनी गुत्तेदार, अधिकार्‍यांना दिली तंबी


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी गुरूवारी गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव, रेवकी, तलवाडा, केकत पांगरी, जातेगाव आदी ठिकाणी चालू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांना तसेच रोजगार हमी योजनेमार्फत पाणंदच्या रस्त्याच्या कामांना अचानक भेटी दिल्या. काही ठिकाणी अधिकार्‍यांना झापले तर काही ठिकाणी गुत्तेदारांना चांगले काम करण्याच्या सूचना देत बोगस कामे खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद दिली.
गुरूवारी सकाळपासून गेवराई पंचायत समितीचे अधिकारी, रोजगार हमी योजनेचे जिल्हास्तरीय अधिकारी, जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्यासह तालुक्यातील दहा गावांना मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी भेटी दिल्या. यामध्ये धारवंटा, चकलांबा, निपाणी जवळका, जातेगाव, केकतपांगरी, धोंडराई, द्तलवाडा, रेवकी आणि बागपिंपळगाव या गावांचा सामवेश आहे. सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान निवास योजना, मोदी आवास योजना, ओबीसी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना या सर्व घरकुल योजनांची चालूस्थितीत असलेली कामे पंचायत समितीने उद्दीष्टानुसार पाठविलेले प्रस्ताव आणि मार्च 2023-24 पर्यंत ही सर्व घरकुले बांधून पुर्ण झाले पाहिजेत याबाबतचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसिंचन विहिरी, कामावर असलेल्या मजुरांचे फोटो अपलोड केले जातात का? या मजुरांची मजुरी, आधार लिंक असलेल्या खात्यानुसार होतेय का? पाणंद रस्त्याचे कामे आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची गावाअंतर्गत असलेल्या समस्या आणि त्यांचे निराकरण यासह सर्व अधिकारी, लवाजम्यासह पाहणी केली. अनेक ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गतच्या कामांना आणि गावकर्‍यांना पिण्यासाठी या योजनेतून पाणी मिळायला पाहिजे, गुत्तेदारांनी हे काम करताना बोगस कामे न करता अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले पाहिजे, अशी ताकीद जलजीवन मिशनच्या अधिकारी आणि गुत्तेदारांना दिली. त्यामुळे सीईओंच्या या अचानक दौर्‍यामुळे गुत्तेदार आणि शासकीय यंत्रणा मात्र अलर्ट झाल्याचे पहायला मिळत आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी
सीईओ पावलोपावली तत्पर
बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम सीईओ अविनाश पाठक हे करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक काम दर्जेदार आणि गतीने झाले पाहिजे, याअनुषंगानेच त्यांचे प्रत्येक कामावर बारीक लक्ष आहे. याचअनुषंगाने ग्रामस्थांना येणार्‍या अडचणीही ते तात्काळ मार्गी लावण्याचे काम खर्‍या अर्थाने करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!