बीड

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 195 कोटींवर बोळवण, सततच्या पावसाचे मागितले चारशे कोटी मात्र सरकारने दिले १९५ कोटी

बीड दि. २० (प्रतिनिधी ) : सततच्या पावसामुळे झालेले नुकसान अतिवृष्टीचे नुकसान गृहीत धरून त्यासाठी आपत्ती प्रतिसाद निदीहीच्या सुधारित दराप्रमाणे निधी देण्याची घोषणा सरकारने एकदा नव्हे तर तीनदा केली, मात्र प्रत्यक्ष मदत देताना बीड जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. जिल्ह्यातून सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून ४०० कोटीचे अनुदान मागणी करणारा प्रस्ताव गेला होता, मात्र सरकारने केवळ १९५ कोटींवर जिल्ह्याची बोळवण केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था ‘राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला ‘ अशी झाली आहे.
बीड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शासनाकडे सर्वात प्रथम सततच्या पावसासाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. यात ४०० कोटींची मागणी करण्यात आली होती. नंतरच्या काळात राज्य सरकारने राज्यासाठीच सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. याची आतापर्यंत तीन वेळा घोषणा झाली आहे. मात्र आता त्यासाठीचा प्रत्यस्ख शासन निर्णय आला आहे. यात राज्यासाठी १५०० कोटींचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्याचा प्रस्ताव ४०० कोटींचा असताना याला कात्री लावण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील ४ लाख ३७ हजार ६८८ शेतकऱ्यांसाठी १९५ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!