महाराष्ट्र राजकारण

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, आज एसटी संपावर तोडगा निघणार?

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. तर मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी 14 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. अशावेळी आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होण्यासारखी नसल्याचं सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय. अशावेळी कुठला मध्यममार्ग या बैठकीतून निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 
दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यात तब्बल साडे चार तास खलबतं झाली. त्यात पवारांनी एसटी महामंडळाची स्थिती समजून घेतली. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी काही महत्वाच्या सूचनाही पवारांनी दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पवारांच्या सूचना पडळकर, खोत यांच्यासह एसची कर्मचाऱ्यांना मान्य होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पवार, परबांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा?
शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बैठकीत एसटी महामंडळाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातमधील एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन आणि सुविधा आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि सुविधा देण्याबाबतीत समान स्तरावर असल्याचं समोर आलं. अशावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तातडीने तोडगा काढा, अशी सूचना पवार यांनी परबांना दिल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्यावी, असा सल्ला पवारांनी दिल्याचं कळतंय.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!