महाराष्ट्र CORONA

राज्यात दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिला इशारा

राज्यात कोरोना रुग्णसंख्या सध्या कमी दिसत असली तरी कोरोनाचं संकट काही संपलेलं नाही. याची काळजी आपण बाळगली पाहिजे. कारण राज्यात दसरा, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिला आहे. राज्यात आत घटस्थापनेच्या (ghatasthapana) मुहूर्तावर आजपासून सर्व मंदिरं सुरू करण्यात आली आहेत. यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकाळी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन अंबेमातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना एका नव्या मोहिमेची घोषणा केली. राज्यात ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत ‘मिशन कवच कुंडल’ (Mission Kavach Kundal) मोहिम राबवण्यात येणार आहे. यात १५ ऑक्टोबरपर्यंत वेगानं कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात कुठेही लस कमी पडणार नाही अशी काळजी या कालावधीत घेतली जाईल असा विश्वास टोपे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राज्यात उद्यापासून दररोज १५ लाख लसीकरण करण्यात येणार आहे आणि यासाठी आपल्याकडे सध्या १ कोटी लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. दसरा (Dussehra) आणि दिवाळीनंतर (Diwali) तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवरच आपण विशेष लसीकरण मोहीम राबवत आहोत. जेणेकरुन आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाहीत. कारण लसीकरण हाच मोठा पर्याय आपल्याकडे आहे, असं राजेश टोपे म्हणाले. मुस्लिम बांधव देखील आता बऱ्यापैकी लसीकरण करुन घेत आहेत. मात्र मालेगावसारख्या ठिकाणी अद्यापही लसीकरण हवं तसं झालेलं नाही. त्या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांचं सहकार्य घेऊन लसीकरण केलं जाणार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!