बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : शेतकर्यांना तीन लाख रूपयांचे पीक कर्ज देण्यास आता जिल्ह्यातील बँका सरसावल्याचे समोर येत आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या आदेशाने बँका सध्या झपाट्याने पीक कर्ज शेतकर्यांना वाटप करीत आहेत. या अनुषंगानेच आजपासून स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या फिल्ड ऑफीसरला दत्तक गावात जावून पीक कर्जाची सगळी प्रक्रिया पुर्ण करणार आहे. दारात आलेली हीच संधी लक्षात घेवून शेतकर्यांनी एक पानी अर्ज करून पीक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.
जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेच्या सर्व पीक कर्ज खातेदारांना अवगत करण्यात येते की, दिनांक 23 जून ते 30 जूनदरम्यान भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी / फिल्ड ऑफीसर त्यांचे अधिपत्याखालील दत्तक गावातील सरपंचांना भेट देतील व नुतनीकरणांस योग्य असलेल्या शेतकर्यांची यादी देऊन संबंधित गावातील शेतकर्यास पिक कर्ज नूतनीकरण करणेस प्रोत्साहीत करतील. त्यासाठी शेतकरी हे फक्त एक पानी अर्ज बँकेत दाखल करून 10 टक्के ते 20 टक्के पर्यंत वाढीव पीक कर्जाचा लाभ घेऊ शकतील. सदर पिक कर्जाचे नुतनीकरण शेतकर्यांना स्टेट बँकेच्या योनो या अॅपवरुन देखील शेतकर्यांना करता येणार आहे. तसेच 3 लाख कर्ज मर्यादेपर्यंतच्या कर्जात डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना व केंद्र सरकारमार्फत प्राप्त होणार्या निर्देशानुसार व्याजात भरघोस सवलतीचा लाभही शेतकर्यांनी देण्यात येईल. तरी विहीत अटी व शर्तीचे पालन करुन या योजनेचा 30 जून 2021 पर्यंत सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप श्री नंदकिशोर भोसले, स्टेट बँक ऑफ इंडिया सहाय्यक महाप्रबंधक, श्री अमोल गायके, नोडल जिल्हा कृषी अधिकारी एसबीआय बीड आणि जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री श्रीधर कदम यांनी केले आहे.