महाराष्ट्र

खासदार राजीव सातव यांचं निधन

पुणे : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना ‘सायटोमेगँलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते.
गेल्या १५ दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगिर रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंत, रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले. काँग्रचे प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

राहुल गांधींचे विश्वासू शिलेदार
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट आली होती. अशा काळात राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारली होती. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा राजीव सातव यांनी पराभव केला होता. राजीव सातव हे सध्या राज्यसभेचे खासदार असून त्यांच्या गुजरात काँग्रेसच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू शिलेदार आहेत. त्याचसोबत माजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!