बीड

खोट्या तक्रारी करणे आले अंगाशी, पोलीसांनी केले गुन्हे दाखल

दिनांक 13/07/2025 रोजी पोलीस स्टेशन केज येथे इसम नामे अंगद अनंत खेडकर रा. तरनळी ता. केज याने फिर्याद सांगीतली की, साखर कारखान्याची ऊस तोडणीसाठी उचल घेवुन गावाकडे जात असतांना मोटार सायकलवरून आलेल्या तीघांनी त्यांचा पाठलाग करुन त्याला रस्त्यात आडवून त्याला शस्त्राचा धाक दाखवुन त्याच्याकडील 1,75,000/- रुपये हिसकावून घेवुन पळून गेले अशी फिर्याद सांगत होता. परंतु पोलीसांकडून सदर प्रकरणात चौकशी केली असता त्यामध्ये सदरचा प्रकार हा बनाव असल्पचे निष्पन्न झाले. पोलीसांना खोटी माहिती देऊन पोलीसांची दिशाभूल केल्यामुळे मुळे सदर इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन केज येथे गुर.नं. 746/2025 कलम 217 भा.न्या.सं. प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दुसऱ्या घटनेत इसम नामे विठ्ठल श्रीहरी माळी रा. मोरेवाडी ता. अंबाजोगई याने डायल 112 ला फोन करुन माहीती दिली की, त्याचे धोंडीराम आण्णा चव्हाण व बरकते रा. गांधीनगर अंबाजोगई यांनी अपहरण करुन त्याला मारहाण करुन त्याच पाय मोडला आहे. तसेच त्याला एका खोलीत डांबून ठेवले आहे. ठिकाण कोठे आहे हे मला सांगता येत नाही. असा फोन केल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी कॉल करणारे व्यक्ती तांत्रीक माहीतीच्या आधारे लोकेशन घेवून त्याचे लोकेशन निश्चीत करुन तेथे पोलीस स्टेशन धारुर येथील सपोनि देविदास वाघमोडे, अंबाजोगई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर खोकले यांना तात्काळ घटनास्थळी पाठवीले. दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटने ठिकाणी जावून पाहीले असता. सदर इसमाने त्याचे अपहरण झाल्याचा खोटा बनाव केला असल्याचे निष्पन्न झाले. त्याने पोलीसांची दिशाभूल केल्यामुळे त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन धारूर येथे गु.र.नं. 451/2025 कलम 217 भा.न्या.सं. प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत इसम नामे सानप शास्त्री भोसले रा. शेरी ता. आष्टी हा दिनांक 09/07/2025 रोजी त्याचे फिर्यादीवरून अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मा. जिल्हाधीकारी कार्यालयासमोर उपोषणास बसला होता. त्याच्या उपोषणाची दखल घेवुन पोलीस स्टेशन आष्टीचे पोलीस निरीक्षक श्री. शरद भुतेकर यांनी त्यास फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे बोलविले. त्यावेळी इसम सानप शास्त्री भोसले यांनी पोलीस स्टेशन येथे कोणतीही तक्रार न देता पोलीस स्टेशन आष्टी येथे त्यांची कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. सदर प्रकार हा पूर्णतः बनावट असून इसम सानप शास्त्री भोसले व गैरअर्जदार यांचेत पैशांचा वाद होता. सदरचा प्रकार हा पैशांच्या व्यवहारातून घडलेला असून तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांनी पोलीस व प्रशासनास वेठीस धरल्याचे निष्पन्न झाले आहे.

“अशा खोट्या तक्रारींमुळे निरपराथ लोकांना विनाकारण त्रास होतो. तसेच ज्या तक्रारी खऱ्या असतात अशा तक्रारीमध्ये सुद्धा पडताळणी करावी लागते. ज्यामुळे खरे तक्रारदार नागरीक यांचे मनामध्ये पोलीसांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होते. त्यामुळे खोटे गुन्हे दाखल करणा-यांवर आता यापुढे गुन्हे दाखल करुन कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. खोटी तक्रार देवुन प्रशासनास वेठीस धरणे, पोलीसांची दिशाभूल करणे, तसेच निरपराध लोकांना विनाकारण त्रास देणे असे प्रकार आता कदापी खपवून घेतले जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत (भा.पो.से.) यांनी सांगीतले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!