बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या मर्डर प्रकरणातील तीन आरोपींचा खून झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. बीडमधील राजकीय गुन्हेगारीचा आणि गुंडशाहीचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर याप्रकरणात पोलीस यंत्रणा आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी विराट मोर्चा थोड्याच वेळात निघत आहे. त्यापूर्वीच अंजली दमानिया यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणात आतापर्यंत चार आरोपी अटकेत आहेत. तर वाल्मिक कराड यांना खंडणीप्रकरणात अटक होत नसल्याने रोष व्यक्त होत आहे. त्यातच उर्वरीत तीन आरोपी अजूनही का पकडले जात नाहीत, यावरून राज्यात संतापाचे वातावरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.















