Site icon लोकाशा-बंब न्यूज

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. त्यामुळे, गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आता राज्यात उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मी नाईलाजाने हे निर्बंध लादत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8.30 वाजता राज्यातील जनेतशी फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील जनतेला सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर, राज्यातील कोरोना परिस्थितीची विदारक परिस्थिती कथन करत, लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. राज्यात कोरोना परिस्थितीचा सर्वाधिक भार वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. आपण दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पण आपल्याला कोरोनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार, राज्यात 14 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत कडक निर्बंध म्हणजेच एकप्रकारचा मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Exit mobile version