Site icon लोकाशा-बंब न्यूज

ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात पंकजाताई कडाडल्या, राज्य घटनेपेक्षा कुणीही मोठा नाही, राज्यातील परिस्थिती विचित्र, यातून राजकीय नेत्यांनी पुढाकार घेवून मार्ग काढावा, दोन्ही समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून त्यांच्यातील वितुष्ट संपवा, ताईंनी मांडली रोखठोक भूमिका


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण स्थगित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व्यक्त करून सरकार त्यांच्या मागण्यांचा नक्कीच सकारात्मक विचार करेल. तसेच त्यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी दिली. शनिवारी भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला पंकजाताई मुंडे यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणावर भाष्य केले. जर बोगस कुणबी प्रमाणपत्र दिले गेले असेल तर ते रद्द केले पाहीजे, अशी मागणी हाके यांनी केली होती, या मागणीलाही त्यांनी पाठिंबा दिला आहे.
ओबीसी आणि मराठा पूर्वी बहुजन होते. पण आता ओबीसी आणि मराठा भांडण लावण्याचे कारस्थान राज्यात यशस्वी होऊ देऊ नये, असे माननार्‍या नेत्यांपैकी मी एक आहे. कुठल्याही मंचावर जाऊन दुसर्‍यांना बोलण्याची भूमिका मी घेतलेली नाही. पण आता राज्यातील परिस्थिती विचित्र नक्कीच झाली आहे. यातून राजकीय नेत्यांनी मार्ग काढला पाहीजे. दोन्ही समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून त्यांच्यातील वितुष्ट संपविले पाहीजे. शेवटी देशाच्या राज्यघटनेपेक्षा कुणीही मोठा नाही. घटना आणि कायद्यापेक्षा कुणीही आणि कोणताही समाज मोठा नाही, असेही पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

लक्ष्मण हाकेंची भूमिका मला भावली
ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या प्रा. लक्ष्मण हाकेंची भाषा, त्यांचे बोलणं, त्यांचे विचार मांडणे, हे सर्व मुद्द्याला धरून आहे. कुणाला ललकारणं, कुणाची बघू म्हणणं किंवा बाह्या सरसावणं ही त्यांची भूमिका नाही. त्यामुळे त्यांचे सालस आंदोलन माझ्यासह सर्वांना भावले, अशीही प्रतिक्रिया पंकजाताई मुंडे यांनी दिली. तसेच हाके आणि वाघमारे यांनी एक प्रतिष्ठा ठेवून त्यांचे मुद्दे मांडल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिले गेले, बाकी कुणी काही बोलत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Exit mobile version