तुळजापूर ।दिनांक ०९।
जेव्हा आपल्याला क्रांती करायची असते, संघर्ष असतो तेव्हा समर्पण पण लागतं. मी नुसत बोलत नाही, तर समर्पण करून बोलते मी पण अज्ञातवास भोगला, कष्ट केले, ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना परत प्रेमानं स्विकारल देखील असं सांगत शिव आणि शक्ती बरोबरच तुमच्या शक्तीचं दर्शन करण्यासाठी मी आलेयं अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पंकजाताई मुंडे यांनी काल रात्री देवी तुळजाभवानीचे दर्शन घेतले, त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे आदी यावेळी उपस्थित होते.
भवानी मातेच्या दर्शनाने आज शक्तीपीठाचे दर्शन पूर्ण झाले. आपण लहानपणापासून असं ऐकलयं की छत्रपती शिवरायांना भवानी मातेने तलवार दिली आणि त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेऊन ते सत्यात उतरवलं. शिवाजी महाराजांनी अशी शपथ घेतली नसती तर आज आपण इथे सुरक्षित उभा राहिलो नसतो. अशीच तलवार पुन्हा पुन्हा कोणाला तरी घेण्यासाठी पुढं यावं लागतं. आज कलियुगात चुकीच्या गोष्टी माणसांना खऱ्या वाटायला लागतात, अशा गोष्टी लोकांना अंगवळणी पडू नये त्यासाठी चांगला विचार करणारे, लोकांचं भलं करणारे, त्यांची सेवा करणारे शासनकर्ते हे वरचेवर वाढू दे अशी तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते असं पंकजाताई म्हणाल्या.
माझं काम समर्पण भावनेनं
ताई, तुम्ही रस्त्यावर या म्हणालात मी आले. आता फक्त घोषणा नकोत, नुसत्या सेल्फी, फोटो नकोत, जेव्हा आपल्याला क्रांती करायची असते, संघर्ष असतो तेव्हा आपल्याला समर्पण पण लागतं. मी नुसत बोलत नाही, समर्पण करून बोलते. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना परत प्रेमानं स्विकारल देखील… माझ्या मनात कुणा विषयी पाप नाही, असूया नाही, द्वेष नाही मला फक्त सत्य आणि सत्य एवढंच कळतयं, तुमचे आशीर्वाद मला पाहिजेत. सत्यापासून मी कधीही ढळू नये असं पंकजाताई म्हणाल्या.
••••