बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : प्रीतमताईंच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष खासदार मिळालेला आहे. त्यांच्या तत्परतेमुळेच आज जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खर्या अर्थाने मार्गी लागला आहे. कारण जलजीवनमधून कोट्यावधींचा निधी घेवून त्या गावागावात पोहचल्या आहेत. काल त्यांनी केज तालुक्यात याच जलजीवनमधून कोट्यावधी रूपयांच्या कामाला गतीने सुरवात केली आहे. त्यांच्या या कर्तव्यदक्ष कामामुळे गावागावातून ताईंचे आभार मानले जात आहेत.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमपणे सुटावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलजीवन मिशन ही योजना हाती घेतलेली आहे, मोदींनी हाती घेतलेल्या याच योजनेला खा. प्रीतमताईंसह जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात गती दिलेली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील 1267 गावात जलजीवनमधून नळाव्दारे ग्रामस्थांना पाणी मिळणार आहे. जिल्ह्यातील एकाही भगिणीला पाण्यासाठी आपल्या डोक्यावर हंडा घेण्याची गरज भसणार नाही, याअनुषंगानेच खा. प्रीतमताई जलजीवनचे काम जिल्ह्यात गतीने करून घेत आहेत. विशेष म्हणजे त्या स्वत: गावागावात जावून या योजनेच्या कामाला स्पीड देण्याचे काम करीत आहेत. शनिवारी त्यांनी केज तालुक्यातील बनसारोळा, होळ, लाडेवडगाव यासह अन्य गावात जावून जलजीवनमधून होत असलेल्या कोट्यावधी रूपयांच्या कामांना सुरवात केली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी, त्यांना घरपोच शुध्द पाणी मिळावे म्हणून मी सातत्यपुर्ण प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना आज अंशत: यश मिळत आहे. तुमचे कष्ट कमी करण्यासाठी, तुमचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सर्व समस्या सोडविण्यासाठी आशिर्वाद रूपी बळ द्या, असा भावही त्यांनी बोलताना आपसूकपणे व्यक्त केला.
आतापर्यंत तिनशे कोटी खेचून आणले,
अडीचशे गावात मिळू लागले नळाव्दारे पाणी
जलजीवन मिशन जिल्ह्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविणार आहे. अगदी हेच लक्षात घेवून खा. प्रीतमताईंनी या कामांना जिल्ह्यात गती दिली आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच आतापर्यंत जलजीवनच्या कामांना तिनशे कोटींचा निधी मिळालेला आहे. यासह जिल्ह्यातील अडीचशे गावात प्रत्यक्ष ग्रामस्थांना नळाव्दारे पाणी मिळू लागले आहे.
