Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा. राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यातील युवा नेता गमावला – सुभाष राऊत, समता परिषदेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण


बीड / प्रतिनिधी
काँग्रेसचे युवा नेते राज्यसभा सदस्य खा.राजीव सातव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने एक उमदा युवा नेता मराठवाड्याने गमावला असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हा अध्यक्ष अॅड.सुभाष राऊत यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अॅड. सुभाष राऊत यांनी म्हटले आहे की, खा.राजीव सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. त्यांच्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काँग्रेस पक्षातील अतिशय निष्ठावान आणि राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेले सातव यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. सातव हे काँग्रेस पक्षातील एक उमदं युवा नेतृत्व होतं. 45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते. तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वाद विवादांमध्ये खा.राजीव सातव सहभागी झाले होते. राज्यातील आणि देशातील तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या सातव यांच्या निधनामुळे देशाने एक युवा संसदरत्न व समाजभुषण व्यक्ती गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खा.राजीव सातव यांना बीड जिल्हा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या वेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तसेच खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपल्याची भावना ना.भुजबळ साहेब यांनी व्यक्त केली आहे. सातव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय सातव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती दवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

Exit mobile version